शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘जो देश शिक्षकांना विसरतो, त्या देशाचा भुगोल बिघडून जातो. संस्कार शिकवणारे कुठलेही सॉफ्टवेअर अजून आलेले नाही. ते काम शिक्षकांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी सोमवारी केले.
खडकी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. संस्थेचे माजी चिटणीस व राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्या स्मरणार्थ शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जातात. संस्थेच्या ११ शाळा-महाविद्यालयांतील प्रत्येकी एका शिक्षकाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले; तर संस्थेसाठी सलग ६१ वर्षे सेवा करणाऱ्या चंद्रकांत भुरेवार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. भोई म्हणाले, ‘आता आपल्या सर्वांनाच गुगलवर काहीही मिळते; पण ती फक्त माहिती असते. मात्र, साधना कशाची करायची यासाठी संस्कार आवश्यक असतात. ते फक्त शिक्षकच देऊ शकतात. मुले त्यांचा आदर्श घेत असतात. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपण आदर्शवत असेच वागायला हवे.’
अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘या संस्थेतच शिकलेले अनेक शिक्षक असल्याने त्यांची या संस्थेवर विशेष निष्ठा आहे. त्यामुळे अनेक बदलांना स्विकारायला ते सहज तयार होतात. या सर्व शिक्षकांनी अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे आमची संस्था प्रगतीपथावर आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
गिरीश ननावरे यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी प्रास्ताविक केले, प्रा. सुग्रीव सावंत व प्रा. बाळासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा चपटे यांनी आभार मानले.
फेट्यांनी बहरली संस्था
या संस्थेत ११ शाळा-महाविद्यालयांत एकूण १६५ शिक्षक-शिक्षिका आहेत. त्या प्रत्येकाचा फेटा बांधून श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आल्याने संपूर्ण सभागृहात फेटेमय वातावरण होते. काहींनी प्रथमच फेटा बांधल्याची भावना बोलून दाखवली.










Total Users : 220497