शबनम न्यूज | प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त घरकुल परिसरात सामाजिक सलोखा, समता आणि परिवर्तनाचा संदेश देणारा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, घरकुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्यात नागरिक, समाजबांधव, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊंना अभिवादन केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक परिवर्तनासाठीच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी, वंचित आणि शोषित समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत होणे ही काळाची गरज असून, सामाजिक समता आणि बंधुभावाची मूल्ये जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाला उजाळा देण्यात आला. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. समाजात शिक्षण, समता आणि परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
या जयंती सोहळ्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. संपूर्ण घरकुल परिसर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
“अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला समतेचा, स्वाभिमानाचा आणि परिवर्तनाचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून त्यांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” अशी भावना कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी सुरेश वैरागर,नरसिंग वैरागर,सतीश रिठे,अशोक भिसे,विलास गडसिंग,संदीप रोकडे,भगवान आढागळे, बजरंग जाधव, पोपट आरणे, कीर्ती जाधव,रोहिणी रोकडे, अरुणा भोसले, मयुरी भोसले, तेजस्विनी भोसले, सुरेखा देवगिरे,वंदना जाधव,सारिका जाधव,विष्णू निकाळजे,
शुभांगी मोरे,जाधव काकू, कापसे साहेब,सोमनाथ कांबळे, गणपत जाधव,राहुल मोरे,नामदेव रिटे,उपस्थित होते.



