spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणला. वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे केवळ विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली नाही, तर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब त्यांच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित करणारी आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे सी. एस. आर. कक्षाअंतर्गत शहरातील विविध उद्योगसमुहांसवेत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सह आयुक्त मनोज लोणकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध उद्योग समूहांचे सीएसआर प्रतिनिधी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, दत्तात्रय वारे गुरुजी यांनी विकसित केलेली शैक्षणिक पद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी असून गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेली सकारात्मक क्रांती ही केवळ काही शाळांपुरती मर्यादित नसून ती राज्य आणि देशपातळीवर विस्तारत आहे. त्यांच्या कार्यामुळे शासकीय शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला असून सरकारी शाळाही जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ शकतात, हा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मान प्राप्त करूनही त्यांनी विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची वाट कायम ठेवली आहे. आजच्या पिढीला सक्षम, सुसंस्कृत आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी त्यांनी सुरू केलेली शैक्षणिक चळवळ देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक शासकीय शाळेत शिक्षणाची नवी उंची गाठण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, गेली तीन दशके मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून या प्रवासात शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आजही देशातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता असून विशेषतः शासकीय शाळांच्या गुणवत्तावृद्धीसाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासकीय शाळा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाल्या तर पालकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलेल. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे आणि सरकारी शाळांचा दर्जा उंचावणे हेच माझे ध्येय राहिले आहे. यासाठी माझ्याकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि शैक्षणिक नवकल्पना समाजाच्या हितासाठी वापरण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे.

शिक्षण क्षेत्रातील हे कार्य कोणत्याही एका व्यक्तीचे नसून सामूहिक प्रयत्नांमधून घडणारी चळवळ आहे. या उपक्रमामध्ये राज्यभरातील अनेक शिक्षक उत्साहाने सहभागी झाले असून विद्यार्थीकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ते कार्यरत आहेत. शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्याचा पूर्ण वेळ या कार्यासाठी समर्पित करण्याची माझी तयारी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी सुरू केलेली ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा आमचा मानस आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!