शबनम न्यूज | प्रतिनिधी
क्रांतीची भूमी असलेल्या सातारा नगरीत आज एक ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होता आले, हे माझे परमभाग्य आहे, अशा भावना विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केल्या.
अण्णाभाऊंच्या विचारांचे स्मारक ठरेल प्रेरणास्थान
या सोहळ्याप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून श्रमिकांच्या, दलितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांचा हा पूर्णाकृती पुतळा केवळ सावळ्या पाषाणाचे स्मारक नसून, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
पुतळा अनावरण सोहळ्यानंतर सातारा येथील शाहू चौक परिसरात मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमवेत आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘समता, बंधुता आणि न्याय’ हा बाबासाहेबांचा विचार जनमानसात अधिक प्रकर्षाने रुजविण्याचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा अविरत पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
या ऐतिहासिक प्रसंगी खासदार छ. उदयनराजे भोसले, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. अण्णाभाऊंचे साहित्य आणि बाबासाहेबांची राज्यघटना या दोन शक्तींच्या बळावरच एक प्रगत महाराष्ट्र घडत असल्याची भावना यावेळी आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली.


