spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची संघटनात्मक बैठक

खासदार सुप्रिया सुळे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी काल रात्री पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक घेतली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सुप्रिया ताई सुळे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन केले. “मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते.यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मागणी नुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या साठी जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

 

हिंजवडीसह मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका करत हिंजवडीचा महानगरपालिकेत समावेश करण्याच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा,अशी भूमिका सुप्रिया ताई सुळे यांनी व्यक्त केली.मात्र, निर्णय काहीही असो,हिंजवडीसह महाराष्ट्रातील नागरिकांना रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे,असे त्यांनी सांगितले.

हिंजवडी आयटी पार्कमुळे मोठी गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. “पवार साहेबांनी हिंजवडी आयटी पार्क गुंतवणुकीच्या स्वरूपात आणले होते; मात्र ही गुंतवणूक उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

हिंजवडीच्या प्रश्नांचा आपण दरमहा सातत्याने आढावा घेत असल्याचे सांगत सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

चाकण येथील घटनेचा उल्लेख करताना सुप्रिया ताई सुळे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मोठे आंदोलन करण्यात आले होते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. चाकण, हिंजवडी, नाशिक यांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध घटकांच्या आंदोलनांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा

राज्यात विविध समाजघटक, विद्यार्थी आणि नागरिक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मनोज जरांगे, MPSC विद्यार्थी, आदिवासी समाज, ओबीसी समाज, धनगर समाज यांच्यासह विविध घटकांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळली गेल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शेतकरी वर्गामध्येही नाराजी असल्याचे सांगत राज्यात विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने सुरू असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली.

“राज्यात २०० आमदारांचे सरकार असूनही विरोध आणि आंदोलने थांबण्याचे नाव घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे,” असे सुप्रिया ताई सुळे यांनी म्हटले.

या संघटनात्मक बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे,सुलक्षणा ताई शिलवंत, सुनील गव्हाणे,विशाल वाकडकर,युवक अध्यक्ष इम्रान शेख,जयंत शिंदे,देवेंद्र तायडे,ज्योती निंबाळकर,संदीप चव्हाण,योगेश सोनवणे,काशीनाथ जगताप,रजनीकांत गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!