विरोध नोंदवताना संवैधानिक मार्गाचा अवलंब करा – राहुल नार्वेकर यांचा इशारा
पिंपरी : विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गांचा अवलंब केला पाहिजे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिला.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, लोकमतचे संपादक संजय आवटे, दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी, लेट्स अप मराठीचे संपादक योगेश कुटे, पुढारी माध्यम समूहाच्या सहसंपादिका मृणालिनी नानिवडेकर, न्यूज 18 मराठीचे सहसंपादक विशाल परदेशी यांच्यासह विविध माध्यम समूहांचे पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राहुल नार्वेकर बोलत होते. यावेळी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पुढील ५० वर्षांच्या शाश्वत विकासाचे व्हिजन संगणकीय सादरीकरणाद्वारे मांडले.
राहुल नार्वेकर यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाचे कौतुक करताना सांगितले की, पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि जगभरात नावाजलेले तसेच वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सोयी-सुविधा उल्लेखनीय आहेत. मात्र, भविष्यातील गरजा आणि वाढते शहरीकरण यांची सांगड घालणे आवश्यक आहे. उपलब्ध नागरी सुविधांचा सर्वांगीण विचार करून पिंपरी चिंचवडच्या सूक्ष्म आणि नियोजनबद्ध विकासाचे मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी समोर ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने ते निश्चितपणे यशस्वी वाटचाल करतील आणि शहराला विकासाची नवी उंची प्राप्त करून देतील.
बऱ्याच वर्षांनंतर पिंपरी चिंचवड शहरात येण्याची संधी मिळाली. पूर्वी गावाच्या स्वरूपात असलेल्या या परिसराने गेल्या काही दशकांत अत्यंत प्रभावशाली आणि विकसित शहर म्हणून घेतलेली झेप ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण आशियासाठी एक उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशियातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक असून, वेगाने होणारे शहरीकरण अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत पद्धतीने कसे करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण या शहरातून पाहायला मिळते, असेही त्यांनी सांगितले.
शहराचा विकास केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीपुरता मर्यादित नसतो. वाढत्या शहरीकरणासोबत नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, प्रशासन अधिक सक्षम करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे. या दृष्टीने पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेले काम महत्त्वपूर्ण आहे, असे राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांची प्रकट मुलाखतही रंगली. विविध माध्यमांच्या संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल नार्वेकर यांनी दिलखुलास उत्तरे देत जोरदार फटकेबाजी केली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सन्मान स्वीकारताना म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराने मला आपल्यात सामावून घेतले आहे. या शहराचा नावलौकिक अधिक उंचावत असताना त्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हे माझ्यासमोरील प्रमुख उद्दिष्ट आहे. आज मिळालेल्या या सन्मानामुळे माझ्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून, शहराच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करेन.
शहरातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनासमोरील प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करीत असतात. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याचे आणि आवश्यक तेथे प्रश्न उपस्थित करण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. पत्रकारांनी केलेली टीका तसेच त्यांनी प्रशासनासमोर मांडलेल्या समस्या शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यातून महापालिका प्रशासनाला आपल्या कामातील त्रुटी समजतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
पत्रकारांनी प्रशासनाला नेहमी आरसा दाखवायला हवा आणि त्या आरशात दिसणारा चेहरा सुधारण्याचे काम प्रशासनाने केले पाहिजे. पत्रकारांनी मांडलेल्या प्रश्नांकडे टीका म्हणून न पाहता त्यातून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा ओळखण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी भूमिका डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेत, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील ५० वर्षांसाठी पिंपरी चिंचवडचा विकास आराखडा
यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पुढील ५० वर्षांच्या शाश्वत, नियोजित आणि दीर्घकालीन विकासाचे विविध पैलू मांडले.
यामध्ये आगामी ५० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन, महापालिका हद्दीतील उंचावरील पाणीसाठे, पवना व इंद्रायणी नदीकाठ विकास प्रकल्प, ड्रेनेज मास्टर प्लॅन, पुढील २५ वर्षांसाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित जागांची सद्यस्थिती व भविष्यातील विकास योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शहरी नाले सुधारणा प्रकल्प, डीपी रस्ते, डेटा सेंटर धोरण आराखडा आणि पार्किंग धोरण यांचा समावेश आहे.
तसेच शहराचे सुशोभीकरण, शहरी हरितीकरण, उद्यानांचा विकास व अद्ययावतीकरण, रुग्णालय सेवांचे बळकटीकरण, भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे, बल्क वेस्ट जनरेटरसाठी नोंदणीकृत भागीदारांमार्फत सुविधा, प्रतिभा शोध कार्यक्रम, अभ्यासिका व व्यायामशाळांची संख्या वाढविणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वाभिमान धोरण, सर्वांसाठी सुलभ पिंपरी चिंचवड, दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती, ‘ऑपरेशन कायापालट’ अंतर्गत स्वच्छता गृह धोरण, क्रीडा सुविधा, पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन, सायन्स पार्क विकास, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण धोरण, सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शन योजना, प्रशासकीय कार्यक्षमता व पारदर्शकता, सुशासन सुधारणा तसेच ‘स्वागतम ई-पास’ आदी विविध उपक्रमांची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले, एसएनबीपी स्कूलचे अध्यक्ष डी. के. भोसले, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, महाराष्ट्रातील पहिले मीडिया टॉवर उभारणारे औटी ग्रुपचे अध्यक्ष बाबासाहेब औटी आणि ‘दान से उडान’ उपक्रम यशस्वीपणे राबविणारे रवी घाटे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई लोकमतचे वरिष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार, दैनिक सकाळचे मुख्य वार्ताहर पितांबर लोहार, पुढारीचे वरिष्ठ वार्ताहर मिलिंद कांबळे आणि ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.










Total Users : 221173