शबनम न्यूज | प्रतिनिधी
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जत, खालापूर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेत जमीन, भाताची रोपे वाहून गेली आहेत. फळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्याबाबतचा अहवाल तत्काळ शासनाला पाठविण्याचे आदेश मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासकीय इमारत खालापूर येथे बुधवारी आढावा घेतला. कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय, आरोग्य, महावितरण सर्व विभागांची बैठक घेतली. आमदार महेंद्रशेठ थोरवे, उपविभागीय अधिकारी कर्जत खालापूर प्रकाश सकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, कर्जत तहसीलदार धनंजय जाधव, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, खोपोली नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज पाटील, खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी कोमल कराळे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, गट विकास अधिकारी खालापूर संदिप कराळ, सार्वजनिक बांधकाम विभागगाचे उपविभागीय उप अभियंता संदेश पाटील, मोरबे नवी मुंबईचे
कार्यकारी अभियंता संतोष उनवणे, तालुका आरोग्य अधिकारी कल्याणी इंगोले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल, एमआयडीसी पातळगंगा अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी आशिष मोरे, खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशमताई मोडवे, शिवसेना खालापूर तालुका संपर्क प्रमुख विजाभाऊ पाटील, शिवसेना खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, शिवसेना महिला आघाडी खालापूर तालुका प्रमुख रेश्माताई आंग्रे, मोतीरा ठोंबरे, उमेश गायकवाड,रोहित विचारे व सबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, कर्जत, खालापूर या तालुक्यांमध्ये ३, ४, ५, ६ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेत जमीन वाहून गेली, बंधारा फुटाला, भाताचे रोपे वाहून गेली. फळ बागांचे नुकसान झाले. या तालुक्यांमधील रस्ते, साकव, छोट्या पुलावांरुन पाणी गेले. पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणचे लोखंडी कठडे वाकले आहेत नदीलगत्याच्या स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते वाहून गेले. खोपोली शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते. पाणीपुरवठा योजना बंद पडली. त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. रस्ते दुरुस्त करावेत. दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याची तत्काळ दुरुस्ती करावी. पुन्हा वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिवृष्टीत दोन्ही ताुलक्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना शासनाच्या वतीने तत्काळ मदत केली आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली जाईल.
आदिवासी पाड्यातील नागरिकांचे पुनर्वसन
खालापूर तालुक्यात माथेरान डोंगरलागत आदिवासीपाडे आहेत. तेथे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेतली जाईल. राज्य शासनाच्या संबंधित मंत्र्यांबरोबरही बैठक घेतली जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे शासनाचे निर्देश पाळावेत. नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल.
श्रीरंग बारणे,खासदार


