शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्यविषयक संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या आरोग्य व स्वच्छता उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नाना काटे यांनी नमूद केले आहे की, अलीकडील मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल, कचरा आणि साचलेले पाणी जमा झाले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
- पूरग्रस्त भागांमधील अतिरिक्त कचरा तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावावी.
- सर्व परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी.
- गटारे, नाले व साचलेल्या पाण्याची तात्काळ स्वच्छता करावी.
- डास नियंत्रणासाठी फॉगिंग व अन्य आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
- आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय पथके तैनात करून नागरिकांना तातडीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.
त्यांनी म्हटले आहे की, पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी कचरा आणि साचलेले पाणी राहिल्याने डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे महापालिकेने विलंब न करता स्वच्छता मोहीम हाती घ्यावी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
“पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही आघाड्यांवर युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे,” असेही काटे यांनी नमूद केले आहे.



