४४६ ग्रॅम गांजा, कार व मोबाईलसह ८.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
चिखली पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.
या कारवाईत ४४६ ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि कार असा एकूण ८ लाख ३२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील जयहरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर, गणेशनगर, तळवडे येथे ही कारवाई करण्यात आली.
अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस शिपाई प्रतिक संभाजी कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
आरोपी राजेंद्र सुरेश पवार (वय २६, रा. आझाद चौक, ओटास्किम, निगडी) याच्या ताब्यात ४४६ ग्रॅम गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. तसेच त्याच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि बलेनो कार (एमएच १४ एमसी ४९११) जप्त करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा बळीराम मोहीते याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र पवार आणि बळीराम मोहीते या दोघांनाही अटक केली आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लांडगे करीत आहेत.



