शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. बारामती येथे लँडिंगदरम्यान भीषण विमान अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान आकाशात घिरट्या घालत होते आणि धावपट्टीपासून अवघ्या सुमारे १०० फूट अंतरावर असतानाच ते अचानक जोरात कोसळले. कोसळताच विमानाला भीषण आग लागली आणि काही क्षणातच विमानाचा चक्काचूर झाला.
अपघातस्थळाच्या दिशेने धाव घेतलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तोपर्यंत विमान पूर्णतः जळून खाक झाले होते. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, विमान प्रथम वरून गेले, पुन्हा वळून आले, त्यानंतर हळूहळू खाली येऊ लागले आणि अखेरीस धावपट्टीला लागल्यासारखे वाटत असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात विमानाचे अनेक तुकडे हवेत उडाले आणि तुटलेल्या अवस्थेत विमान फिरत राहिले. काही क्षणांतच जागेवरच पुन्हा स्फोट होऊन भीषण आग लागली.
एका शेतकरी महिलेच्या घराजवळही विमानाचे अवशेष पडल्याची माहिती तिने दिली. “विमान आधी वर दिसत होते, नंतर खाली येऊ लागले आणि अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला,” असे तिने सांगितले.
आज सकाळी या विमानाने बारामती दौऱ्यासाठी उड्डाण केले होते. बारामतीत लँडिंग करत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे लँडिंगदरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह एकूण सहा जण प्रवास करत होते. या सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून बचाव आणि तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


