spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांची दुर्दशा; खड्डे युद्धपातळीवर बुजवा – विश्वजीत बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.  शहरातील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर बुजवण्यात यावेत. दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची  मागणी शिवसेना गटनेते  विश्वजीत बारणे यांनी महापालिकेचे आयुक्त मा. डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महानगरपालिकेने शहरात रस्ते विकासासाठी व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. मात्र, पावसाळ्याच्या अवघ्या काही दिवसांतच हे रस्ते उखडले असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून महापालिकेच्या गुणवत्तेवर व नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करदात्या नागरिकांच्या कष्टाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अशा प्रकारे वाया जात असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

रस्त्यांच्या कडेला खडी पडल्यामुळे दुचाकीस्वारांचे लहान-मोठे अपघात सातत्याने होत आहेत. वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाची कामे करूनही तेच ठेकेदार पुन्हा कामासाठी निवडले जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता, कामांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे कसलेही प्रभावी नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळेच वारंवार निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, असे बारणे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!