शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे गुरव येथे रस्त्यात उभे असलेल्या युवकाला बाजूला होण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून १८ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील तालमीजवळ ही घटना घडली. फिर्यादी राम बंडू आरड (वय १८) हे दुचाकीवरून कामावर जात असताना आरोपी ऋषी माने हा रस्त्यात उभा होता. त्याला बाजूला होण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपीने “तुझ्या बापाचा रस्ता आहे का?” असे म्हणत शिवीगाळ केली आणि “थांब, तुला दाखवतो,” अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.
काही वेळाने आरोपी ऋषी माने, प्रणव इरकल, आदित्य शिंदे आणि नागेश चव्हाण हे दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले. चौघांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी ऋषी माने याने सोबत आणलेल्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर व गळ्याखाली वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, आरोपी प्रणव इरकल याने कंबरेला खोचलेला कोयता काढून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीचा मित्र लक्ष्मण लोखंडे याने वेळेवर फिर्यादीला मागे ओढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रणव इरकल याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.



