पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला स्मशानभूमीजवळ नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी वराळे येथील डी. वाय. पाटील कॉलेजसमोर फिर्यादीला आरोपींनी अडवले. जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी त्याला मारहाण केली आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवून माळवाडी येथील स्मशानभूमीकडे नेले.
तेथे पुन्हा लाथाबुक्क्यांनी आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीला सुमारे अर्धा ते पाऊण तास डांबून ठेवले. या मारहाणीत त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून चेहऱ्यावर व शरीरावर जखमा झाल्या आहेत.
या प्रकरणी सुधर्म चव्हाण, वेदांत वाळुंजकर, सुशांत नगीने आणि ऋषिकेश बदले यांच्याविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरण, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रळेकर करीत आहेत.


