spot_img
spot_img
spot_img

संतसाहित्यातून योग्य आहारविहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘ज्ञानेश्वर माउली, जगद्गुरू तुकोबाराय आणि संतांनी आपल्या साहित्यातून वारीच्या काळात योग्य आहारविहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले आहे!’ असे विचार महाराष्ट्र राज्य सकळ संत विचार समितीचे अध्यक्ष ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर यांनी सावरकर मंडळ सभागृह, प्राधिकरण निगडी येथे शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पिंपरी – चिंचवड जिल्हा आयोजित श्रीक्षेत्र चिंचवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यानच्या आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याच्या शुभारंभाचे उद्घाटन करताना ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे बोलत होते. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, नितीन वाटकर, प्रांत उपाध्यक्षा माधवी सौंशी, उद्योजक सुरेश पटेल, जिल्हा अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला, जिल्हा मंत्री संभाजी बालघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर पुढे म्हणाले की, ‘हरिभक्तांना वारीत चालण्याची ताकद अन् सतत नामस्मरणाचे बळ लाभावे यासाठी संतसाहित्यातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्या ३९ वर्षांपासून विश्व हिंदू परिषद तोच विचार आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याच्या माध्यमातून समर्थपणे पुढे नेत आहे. याप्रसंगी ॲड. सतिश गोरडे यांनी, ‘प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक वारीसाठी विश्व हिंदू परिषद सुमारे ३९ वर्षांपासून आरोग्य सेवाकार्याचे आयोजन करीत असते. पिंपरी – चिंचवड येथील माउली आणि तुकोबाराय यांची वारी तसेच नाशिक येथून येणारी संत निवृत्तीनाथ यांची वारी पूर्णत: पर्यावरणपूरक असावी ही काळजी घेण्यात येते. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि औद्योगिक आस्थापनांना केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रत्येक वारीत सहा सुसज्ज रुग्णवाहिका, वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिका यांचे पथक, अत्यावश्यक औषधांचा साठा अशा जय्यत तयारीनिशी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ होत आहे. सातत्यपूर्ण आरोग्यसेवेचे हे चाळीसावे वर्ष आहे!’ अशी माहिती दिली. 
विश्व हिंदू परिषद प्रांत सेवा सहप्रमुख डाॅ. शर्वरी यरगट्टीकर यांनी प्रास्ताविक केले. संभाजी बालघरे यांनी मनोगत व्यक्त केले. यशवंत देशपांडे, पी. एस. पुजारी बाळासाहेब वाघ, ॲड. मनीषा नंदा यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. ललित झुनझुनवाला यांनी आभार मानले. संयोजन परेश पटेल, विजय देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, तेजस्विनी ढोमसे, नवनाथ साकोरे, अरविंद लंघे, पन्नालाल जाधव, कौशल रावल यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!