शबनम न्यूज | प्रतिनिधी
आपल्याला मिळालेला पद्म पुरस्कार हा आपला एकट्याचा नसून तो मराठी लोककलेला , लोककलावंतांना, पडद्यामागील कलावंतांना आणि लोककलेच्या रसिकांना मिळालेला पुरस्कार आहे. मात्र, हा पुरस्कार जितका सन्मानाचा आहे तेवढाच जबाबदारीचा आहे. याचे भान लोककलावंतांनी ठेवणे आवश्यक आहे, याची जाणीव पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी करून दिली.
यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या दिपाली कांबळे,चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत,बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या बालगंधर्व महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकरंग त्रिवेणी’ या कार्यक्रमात खेडकर बोलत होते. या कार्यक्रमात खेडकर यांच्यासह मराठी लोकसंगीतातील ज्येष्ठ गायक आनंद शिंदे सहभागी झाले. लोककला अभ्यासक भूषण कोरगावकर आणि पराग चौधरी यांनी या मान्यवरांना बोलते केले.
दीर्घकाळ तमाशासारख्या लोककलांना लोकाश्रय असला तरी देखील समाज मान्यता नव्हती. समाजाकडून तमाशाला प्रतिष्ठा दिली जात नव्हती. पद्म पुरस्कार मिळाल्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे. तमाशाला लोकमान्यता मिळत आहे. मात्र, या पुरस्काराने तमाशा कलावंतांचा जितका सन्मान झाला आहे तितकीच त्यांची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून लोककलावंतांनी आपल्या सादरीकरणाला चौकट घालून घेणे आवश्यक आहे, असे मत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले. या जबाबदारीचे भान लोक कलावंतांनी ठेवले तर लोक कलेला पुन्हा चांगले दिवस येतील अन्यथा ती नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अश्लीलता ही सापेक्ष संकल्पना आहे. शास्त्रीय संगीत ज्याप्रमाणे चौकटीत बांधलेले असते त्याप्रमाणे लोकसंख्येच कोणतीही चौकट नसते. त्यामुळे लोककलांमधील शृंगार आणि विनोद अश्लील तिकडे झुकत असल्याचा आरोप केला जातो. मात्र, अश्लीलता ही लोककलांमध्ये नव्हे तर तिचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये असते, असा दावा आनंद शिंदे यांनी केला. आपण सादर केलेल्या कोणत्याही गाण्यांमध्ये द्वयर्थ नाही. मात्र, ती गाणी ऐकणारे लोकच आपापल्या बुद्धीने त्या गाण्यांचा मूळ अर्थ बाजूला ठेवून भलतेच अर्थ लावत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अश्लील त्याच्या मुद्द्यावरून लोककलेच्या मुशीत घडलेले विख्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडके यांनी अनेकदा सेन्सर बोर्डाला पेचात पकडल्याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बारीपासून वारीपर्यंत सर्व कलांचे रसिकाग्रणी असलेल्या आनंद शिंदे यांनी लोककलांचे महत्त्व विशद केले. खुद्द घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शास्त्रीय संगीताची सखोल माहिती होती. तसेच लोककलांच्या प्रभावाची पुरेपूर जाणीव होती, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दोन तासाचे भाषण जेवढ प्रभाव निर्माण करू शकत नाही तेवढा प्रभाव अर्ध्या तासाचा जलसा निर्माण करू शकतो, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच आंबेडकरी चळवळीत आंबेडकरी जलशांना महत्त्व असल्याचे आनंद शिंदे यांनी नमूद केले.
बालगंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशीची सुरुवात गणेश वंदना सादरकर्त्या अंजली राऊत आणि सहकारी ,संगीत कलानिधीचे देणे,नारीशक्ती नृत्य नाटिका लोकरंग त्रिवेणीसह मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलावंतांची थेट भेट, विदुषी सानिया पाटणकर आणि सहकलावंतांचा नाट्यभक्ती स्वरधारा, सचिन, शैलेश येवले व सह कलाकारांचा वंदना महामानवांना, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपुर यांच्या अमित गाण्यांची यादे, हर मॅजेस्टी ही संगीत रजनी या कार्यक्रमांचा आस्वाद संगीत आणि बालगंधर्व रंगमंदिर प्रेमींनी घेतला.
तर दुसऱ्या दिवशी करावके हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम,बबल शो,जादूचे प्रयोग आणि रंगतदार पारंपारिक लावणी सादर झाली.


