आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील समन्वय, विश्वास आणि परस्पर सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संघभावनेने काम केल्यास उद्दिष्टे वेळेत आणि गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण होऊ शकतात. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनविण्यास भर द्यावा, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला, त्यावेळी सूचना देताना ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी आणि अधिकारी, कर्मचारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
बैठकीत अग्निशमन विभागाकडे इमारतींच्या ना हरकत दाखल्यांसाठी (एनओसी) प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या प्रक्रियेबाबत आढावा घेण्यात आला. या अर्जांच्या तपासणी व निर्गम प्रक्रियेत विलंब होऊ नये, तसेच प्रत्येक अर्ज निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सेवा वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत व परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील विविध प्रभागांमध्ये अधिकृत हॉकर्स झोनची आवश्यकता लक्षात घेता, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात योग्य व सुरक्षित जागांची पाहणी करून उपलब्ध करून द्यावी. या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींचा, विशेषतः नगरसेवकांचा सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या सूचना व अभिप्राय विचारात घ्यावेत, जेणेकरून हॉकर्स झोन नियोजन अधिक व्यवहार्य आणि स्थानिक गरजांनुसार होईल, असेही नमूद करण्यात आले.
उद्यानांचे सुशोभीकरण, देखभाल आणि आधुनिकरण यावर भर देण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. उद्यानांमध्ये नागरिकांना आकर्षित करण्यासाठी आणि तांत्रिक नवकल्पना राबवण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात याव्यात. या स्क्रीनद्वारे महापालिकेचे विविध उपक्रम, जनजागृती संदेश तसेच आवश्यक माहितीपूर्ण व जाहिरात स्वरूपातील सामग्री प्रदर्शित करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. यामुळे उद्यानांचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता माहिती व जनजागृतीचे केंद्र म्हणूनही होईल, असेही ते म्हणाले. याशिवाय, नागरिकांमध्ये उद्यानांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने विशेष उपक्रम राबविण्याचे आयुक्त यांनी सुचविले. अनेक नागरिकांना शहरातील विविध उद्यानांची माहिती नसल्याने, डिजिटल माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. त्याअंतर्गत रील्स स्पर्धांचे आयोजन करून तरुणाईचा सहभाग वाढवून उद्यानांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढविण्यावर भर द्यावा.
तसेच स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी रस्त्यांचे दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणे यांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. केवळ स्वच्छता न ठेवता त्याची सातत्यपूर्ण दुरुस्ती व देखरेख यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसेच स्मार्ट सारथी व आपले सरकार पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळेत व गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश देखील आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले. नागरिकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट सारथी सेवा व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबवव्यात. यामुळे नागरिकांना तक्रार नोंदणी व पाठपुरावा अधिक सुलभपणे करता येईल, असेही ते म्हणाले.
याव्यतिरिक्त स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत यांसारख्या प्रमुख विभागांतील चालू प्रकल्पांचा दर सोमवारी नियमित आढावा घेतला जाणार असल्याचे आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात यावा. प्रकल्प व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध व परिणामकारक होण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून कामकाज करावे, जेणेकरून अडथळे कमी होतील आणि कामांची गती वाढेल, असेही ते म्हणाले.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे संघभावनेने काम करावे, असे आवाहन केले. प्रशासनातील समन्वय, विश्वास आणि सहकार्य वाढविणे हे शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच जनगणनेच्या कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या विभागीय कामाचा ताण कमी करावा. जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे, कालमर्यादित आणि राष्ट्रीय स्वरूपाचे काम असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुख्य जबाबदारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी आवश्यक सहकार्य करावे, यामुळे जनगणनेचे कामकाज वेळेत आणि अचूकपणे पूर्ण होण्यास मदत होईल, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यावेळी म्हणाले.


