spot_img
spot_img
spot_img

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शंभूजयंती उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ढोल-ताशांचा निनाद, भगवी पताका, पहाडी आवाजातील गगनभेदी शिव-शंभू गर्जना, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे!’ आणि ‘नमो पार्वती पते, हर हर महादेव’ या घोषणांच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात (एडीटी) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

एमआयटी एडीटी विद्यापीठातील उर्मिलाताई कराड सभागृहात प्रतिमापूजन, शिव-शंभू गर्जना व विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या व्याख्यानाद्वारे स्वराज्याचे धाकटे छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. याप्रसंगी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शिवराय ढोल-ताशा पथकातील सदस्यांचा त्यांच्या पथकातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. व्याख्यानानंतर सभागृहात ‘छावा’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील प्रसंग मोठ्या पडद्यावर अनुभवताना सभागृहातील विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तर चित्रपटाचा शेवट पाहताना सभागृहातील वातावरण अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

छत्रपती संभाजी महाराजांमुळे महाराष्ट्रधर्म टिकला – डॉ. कराड
याप्रसंगी व्याख्यानात प्रा. डॉ. कराड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत आहेत. शिवरायांनंतर स्वराज्यावर चालून आलेली संकटांची मालिका छत्रपती संभाजी महाराजांनी लीलया पेलली. छत्रपती झाल्यानंतर त्यांनी पुढील नऊ वर्षे अविरत, न थकता असंख्य लढाया लढल्या आणि सर्वच जिंकल्या. त्यांच्या चिवट प्रतिकारामुळेच औरंगजेबाचे लाखोंचे बलाढ्य सैन्यही हतबल झाले. त्यामुळे संभाजी राजांचे इतिहासातील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्यामुळेच खरंतर महाराष्ट्रधर्म टिकला, वाढला,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!