spot_img
spot_img
spot_img

पनवेलसाठी सिडकोने पाणी उपलब्ध करून द्यावे ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरासाठी वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत आहे. त्यामुळे सिडकोने या भागासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सिडको प्रशासनाला केली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी बेलापूर येथील सिडको कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व व्यवस्थापकीय उप संचालक गणेश देशमुख यांच्या समवेत मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेतली. पनवेल शहरातील खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरासाठी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. तसेच पनवेल महानगरपालिका आणि सिडको संबंधित विविध प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, विनोद साबळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, अमर म्हात्रे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, पनवेल महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरासाठी वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत आहे. या भागात सिडकोच्या परवानगीने मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेले आहेत. पनवेलमधील काही भाग सिडकोकडे होता. तो भाग आता महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सोडवण्याची मोठी जबाबदारी सिडकोची आहे. सिडकोकडे अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. सिडकोने अतिरिक्त पाणी पनवेल महापालिकेला द्यावे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावेत. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कचरा संकलन, वाहतुकीचे नियोजन करावे. वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेऊन नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.

पनवेलच्या महापौरांशीही पाणीपुरवठ्याबाबत चर्चा

पनवेलचे महापौर नितीन पाटील यांचीही खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली. पनवेल शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली. वाढती लोकसंख्या आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि भविष्यातील उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अर्जुन म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, नगरसेवक चेतन भगत, हरीश केणी, सुमित झुजरराव उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!