शबनम न्यूज | प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अनोखा उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या रंगीबेरंगी आणि विविध आकारांच्या राख्या भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.
विद्यालयात राखी बनविण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या. घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांसोबत आपणही रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आहोत, हा भावनिक संदेश या माध्यमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. राख्या तयार करताना विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. जवानांप्रती असलेला आदर आणि देशसेवेची भावना त्यांच्या कृतीतून प्रकर्षाने जाणवली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका हर्षदा राऊत, मंगल आव्हाड, सोनाली जाधव, तुपे तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
“विद्यालयामध्ये मागील तीन वर्षांपासून सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत,” असे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी सांगितले.





Total Users : 215848