शबनम न्यूज | प्रतिनिधी
ऑनलाइन फसवणूक प्रकरणात आळंदी पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भारतातील चार नागरिकांची फसवणूक करून एकूण ५० हजार ५० रुपये रक्कम उकळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण बाबासाहेब पाळवदे (वय २३, सध्या रा. देहू फाटा, पुणे; मूळ रा. बीड) याने ऑनलाइन माध्यमातून साथीदारांसोबत संगनमत करून फसवणुकीचा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्याच्या नावावर असलेल्या बँक खात्याचा वापर करून फसवणुकीच्या रकमेतील हिस्सा घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दि. १२ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत राजगुरू सहकारी बँक, आळंदी शाखेशी संबंधित खात्याच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई अविनाश तुकाराम सोळंके (बक्कल नं. ३६०१) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच फसवणुकीसंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फुले व पोलीस उपनिरीक्षक खडके करीत आहेत.



