spot_img
spot_img
spot_img

पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

पुणे / प्रतिनिधी :सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण आजपर्यंत निश्चित करण्यात आलेले नाही. ते करण्याचा आपला मानस असून त्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्यात कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

बालगंधर्व रंग मंदिराच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत करण्यात आलेल्या बालगंधर्व महोत्सवात महापौरांच्या हस्ते रात्री बारा वाजता केक कापून रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे,तृप्ती देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी देखील महापौरांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. बालगंधर्व रंगमंदिर ही कलाकार आणि कला रसिकांसाठी जिव्हाळ्याची ऐतिहासिक वास्तू आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कोणाचाही विचार नाही. कलाकार आणि रसिक या दोघांच्या सोयीसाठी अधिक सुविधा निर्माण करणे हाच पुनर्विकासाचा मुख्य हेतू आहे. हे सर्व बदल कलाकारांचा सल्ला घेऊन, त्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येतील. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे अशी समजूत कोणीही करून घेऊ नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या सर्व सांस्कृतिक सभागृहांची नोंदणी पारदर्शक रीतीने ऑनलाइन पद्धतीने करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे बालगंधर्व महोत्सवासाठी वर्षातील तीन दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात येतील, अशी खात्री देखील त्यांनी दिली.

रात्री बारा वाजता उपस्थित राहून बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाचा केक कापणाऱ्या मंजुषा नागपुरे या पहिल्या महापौर ठरल्याचेही मेघराज राजेभोसले यांनी आवर्जून नमूद केले.

बालगंधर्व रंगमंदिराबाबत आस्था असणाऱ्या कलाकारांकडून सलग अठरा वर्ष बालगंधर्व महोत्सव स्वयंस्फूर्तीने साजरा केला जात आहे. या निमित्ताने कला रसिकांसाठी संगीत रजनी, लावणीसारखे लोककलेचे प्रकार, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, कलाविषयक व्याख्याने, परिसंवाद असे कार्यक्रम मोफत सादर केले जातात. मात्र, बालगंधर्व महोत्सवाच्या वेळी अनेकदा बालगंधर्व रंगमंदिरांच्या तारखांची अडचण निर्माण होते. त्यामुळे वर्धापन दिनाला जोडून तीन दिवसांच्या तारखा या महोत्सवासाठी राखीव ठेवाव्या, अशी मागणी मेघराज राजेभोसले यांनी यावेळी महापौरांकडे केली. त्याचप्रमाणे कलाकार पदरमोड करून आयोजित करत असलेल्या या महोत्सवाला महापालिकेकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच बालगंधर्व रंग मंदिराचा पुनर्विकास करताना मूळ वास्तू न पाडता पुनर्विकासाचा प्रयत्न करावा आणि त्यामध्ये कलाकारांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणीही भोसले यांनी कलाकारांच्या वतीने केली. यापैकी बहुतेक मागण्या महापौरांनी तात्काळ मान्य केल्या.

बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाच्या पुर्व संध्येला रात्री बारा वाजता उपस्थित राहून मा. महापौर यांनी कलाकार स्त्री शक्तीला वंदन केले आहे आणि ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड मंदार जोशी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग चौधरी यांनी, तर आभार प्रदर्शन अनिल गुंजाळ यांनी केले.

 

केवळ आश्वासने देत नाही म्हणूनच…

या कार्यक्रमात मेघराज राजेभोसले यांनी कलाकारांच्या वतीने केलेल्या बहुतेक मागण्या महापौरांनी तात्काळ मान्य केल्या. मात्र, बालगंधर्व महोत्सवाला निधी देण्याच्या बाबतीत त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. अर्थातच, उपस्थित आणि महापौर नागपुरे यांना या मागणीची आठवण करून दिली. किमान आश्वासन तरी द्या, असे उपस्थितांकडून सुचविण्यात आले. यावेळी, मी राजकारणी असले तरीही केवळ पोकळ आश्वासने देत नाही. कदाचित त्यामुळेच मी बिनविरोध निवडून येऊन महापौर पदावर विराजमान झाले आहे, अशी स्पष्टोक्ती नागपुरे यांनी केली. बालगंधर्व महोत्सवाला निधी देण्याबाबत योग्य माहिती घेऊन त्याबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!