spot_img
spot_img
spot_img
spot_img

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आज देशभरात आपण ज्यांना भटके-विमुक्त म्हणतो, तो समाज एकेकाळी ज्ञानी समाज होता. हा समाज आपले ज्ञान निरपेक्षपणे समाजाला वाटण्यासाठी घराबाहेर पडला आणि काळाच्या ओघात हा समाज भटका आणि वंचित बनत गेला. ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून संपूर्ण पारधी-आदिवासी समाजावर गुन्हेगार जमातीचा शिक्का लावण्यात आला, त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात मागास राहिला. परंतु श्री सद्गुरू धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टच्या या शाळेत अमनोरा येस फाउंडेशनच्या पुढाकाराने पारधी मुलांसाठी अत्याधुनिक सुविधा तयार झाल्याचे पाहून अत्यधिक आनंदाची आत्मानुभूती होत आहे. देशाला ख-या अर्थाने विश्वगुरू बनवायचे असेल, तर अशा वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
खामगाव येथे स्व. भय्यूजी महाराज यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पारधी-आदिवासींच्या आश्रम शाळेत अमनोरा येस फाउंडेशन द्वारे तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक तीन क्रीडा संकुलांचे व विविध प्रकारच्या सुविधांचे उद्घाटन डाॅ. मोहन भागवत यांच्या हस्ते शुक्रवार ८ आॅगस्ट रोजी करण्यात आले. या वेळी मोहन भागवत बोलत होते. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डाॅ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिटी कार्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे, श्री सद्गुरू धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्या विश्वस्त डा. आयुषी देशमुख आदि उपस्थित होते.
सर्वप्रथम मोहन भागवत यांनी अमनोरा येस फाउंडेशनच्या सहकार्याने आश्रम शाळेत करण्यात आलेले विविध विकासकार्याची पाहणी केली. शाळेतील अत्याधुनिक खेळाची मैदाने, मुलांसाठी स्वयंपाक तयार करणारी भोजनशाळा, विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग आणि वसतिगृहाची डाॅ. भागवत यांनी पाहणी केली. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी डाॅ. मोहन भागवत यांचे सहर्ष स्वागत केले.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, एकेकाळी भारताचा समाज हा पूर्णपणे संघटित होता, परंतु परकीय आक्रमणामुळे समाज गुलाम बनत गेला व नंतर विघटित झाला. त्यातूनच मग समाजात वंचित घटकांची संख्या वाढत गेली. असे असले तरी समाजातील वंचित घटकांनी कधीही पारतंत्र्य स्वीकारले नाही. ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत राहिले. इंग्रजांच्या काळात पारधी-आदिवासींना गुन्हेगार ठरवले गेले, त्यामुळे त्यांचा विकास खुंटला. पारध्यांच्या विकासासाठी संघ अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. या स्थितीत भय्यूजी महाराजांनी जी शाळा उभारली, त्या शाळेला नवे रूप देण्याचे तसेच येथील मुलांना स्वयंपूर्ण बनवण्याचे कार्य अमनोरा येस फाउंडेशन करीत आहे. हे कार्य नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
प्रस्तावना करताना सिटी कार्पोरेशनचे एमडी अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, डा. मोहन भागवत यांच्या सूचनेनुसारच अमनोरा येस फाउंडेशन या शाळेच्या उत्थानासाठी कार्याला लागली आणि पाहता-पाहता पारधी आदिवासींच्या समाजातील मुले-मुली आज प्रगती आणि स्वयंपूर्णतेच्या आकाशात उंच भरारी घेत आहेत. हा आमच्यासाठी अत्यंत कृतज्ञतेचा क्षण आहे. वंचितांच्या विकासासाठी अमनोरा येस फाउंडेशन शैक्षणिक, वैद्यकीय यासह अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजपरिवर्तनाच्या दिशेने कार्य करीत आहे आणि आगामी काळातही हे कार्य अव्याहतपणे सुरू राहील, अशी ग्वाही अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली.
आदिवासी मंत्री डा. अशोक उईके यांनी पारधी व आदिवासींच्या विकासासाठी शासन सातत्याने प्रयत्न असून, त्यानुसार विविध योजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आकाश फुंडकर म्हणाले की, ही आश्रमशाळा खामगावची शान असून, या ठिकाणी वंचित मुलांच्या विकासासाठी होणारे कार्य नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले, तर आश्रमशाळचे मुख्याध्यापक राठोड यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात डा. मोहन भागवत यांच्या हस्ते १६ पारधी आदिवासी मुलींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या चेकचे वितरण करण्यात आले, तसेच विविध क्षेत्रात कार्य करणा-या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचाही डा. भागवत यांनी सन्मानित केले.
या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!