शबनम न्यूज | प्रतिनिधी
विश्वबंधुता साहित्य परिषद, विश्वबंधुता काव्यमंच आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने क्रांती दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित तिरंगा महोत्सवात दिला जाणारा ‘संविधान सन्मान साहित्य पुरस्कार’ यंदा प्रसिद्ध गीतकार आशाताई शिंदे-गायकवाड यांना जाहीर झाला आहे. शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे येथे होणाऱ्या महोत्सवात तिरंगा महावस्त्र, संविधान राष्ट्रग्रंथ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
“महोत्सवात ज्येष्ठ साहित्यिका ऍड. प्रार्थना सदावर्ते यांच्या हस्ते कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांच्या ‘वाणी विश्वबंधुतेची’ या भाषण संग्रहाचे प्रकाशन होईल. ‘विश्वबंधुतेची पहाट’ काव्यसंमेलनात २५ निमंत्रित कवी सहभागी होतील. स्वागताध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुर्के, प्रकाशक मंदाकिनी रोकडे यांचा विशेष सहभाग असणार असून, काही निवडक साहित्यिकांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,” असे प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.



