नगरसेविका रेश्मा बापूजी कातळे व सामाजिक कार्यकर्ते बापू दिनकर कातळे यांनी महापालिकेला दिल्या तातडीच्या सूचना
शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १६ मध्ये वाढत्या कचरा संकलन व कचरा व्यवस्थापनाच्या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेविका सौ. रेश्मा बापूजी कातळे आणि सामाजिक कार्यकर्ते बापू दिनकर कातळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रभागातील अनेक भागांमध्ये नियमित व वेळेवर कचरा संकलन होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. परिणामी दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना नियमित कचरा उचल, विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, अतिरिक्त मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून देणे, तसेच कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी रेश्मा बापूजी कातळे म्हणाल्या, “स्वच्छ आणि निरोगी परिसर हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. प्रभागातील स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांना दर्जेदार स्वच्छता सेवा मिळावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू.”
सामाजिक कार्यकर्ते बापू दिनकर कातळे यांनी सांगितले, “कचरा व्यवस्थापन ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मात्र, प्रशासनानेही आपली जबाबदारी वेळेत आणि प्रभावीपणे पार पाडणे गरजेचे आहे. समस्या कायम राहिल्यास नागरिकांसह तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही आम्ही देत आहोत.”
प्रभागातील नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, ओला व सुका कचरा वेगळा द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


