शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात तक्रार नोंदविणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची कार्यालये अथवा संपर्क कक्ष प्रत्येक तालुका स्तरावर सुरू करण्यात यावीत, अशी मागणी पुण्यातील मुक्त पत्रकार ओमप्रकाश आदमवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
३ जुलै २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या FDA ची बहुतांश कार्यालये जिल्हा स्तरावर कार्यरत असल्याने ग्रामीण आणि तालुका स्तरावरील नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हा मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेक तक्रारी नोंदवल्याच जात नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष होते.
मागणीतील प्रमुख मुद्दे –
- प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालय, नगरपालिका किंवा नगर परिषदेत FDA संपर्क कक्ष सुरू करावा.
- भेसळयुक्त अन्न व बनावट औषधांविरोधात नियमित तपासणी मोहीम राबवावी.
- नागरिकांसाठी तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करावी.
- अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत.
- नमुने तपासणीसाठी स्थानिक स्तरावर व्यवस्था उभारावी.
निवेदनात भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे अन्नविषबाधा, यकृत व मूत्रपिंडांचे आजार, हृदयविकार तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची आणि संबंधित विभागाकडून तत्काळ कारवाई होण्याची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


