पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
आकुर्डी येथील शिवनेरी गृह निर्माण संस्था (प्रधानमंत्री आवास योजना) येथील रहिवाशांच्या वतीने गुरुवारी (दि. २ जुलै) महावितरणच्या आकुर्डी विभाग कार्यालयात प्रीपेड स्मार्ट मीटर हटवून पूर्वीप्रमाणे वीज मीटर बसविण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलात अनपेक्षित वाढ, वीज वापराच्या नोंदीतील तफावत तसेच बिलांच्या अचूकतेबाबत शंका निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करून अन्यायकारक पद्धतीने आकारण्यात आलेल्या रकमेचे समायोजन करावे तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर, विशाल भालेराव, जिजाबराव जाधव, अंकुश गंगणे, सादिक पठाण, युवराज चौधरी, विक्रम बनकर, प्रकाश जगताप, बालाजी पाटील, तुकाराम भालेराव, विपुल झोपे, उत्तम बाबरे, जुनेद अन्सारी, रवी गवळी, दिनेश काळे यांच्यासह प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक रहिवासी उपस्थित होते.



