शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्ह्यातील रस्ते अपघातात नागरिकांचे होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातग्रस्त (ब्लॅकस्पॉट) प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. सर्व संबंधित विभागाने स्थळ पाहणी दरम्यान सुक्ष्म निरीक्षण नोंदवून अल्प व दिर्घकालीन उपाययोजना सूचवाव्यात, याबाबत लवकरच आढावा बैठक घेवून कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जातील, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, पुण्याचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे राहूल जाधव, बारामतीचे सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे अपघातामुळे होणारे मृत्यू रोखण्याला प्राधान्य देण्यात यावे.
पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी संयुक्त स्थळ पाहणी करावी. ब्लॅक स्पॉटची संयुक्त पाहणी करून अपघाताची कारणे व आवश्यक उपाययोजना याबाबतचा अहवाल २९ जून २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे. अपघात रोखण्याकरिता स्थळ पाहणी अहवालात सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांप्रमाणे सर्व संबंधित विभागाने गांर्भीयाने कार्यवाही करुन जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, याबाबत सर्व संबंधित विभागाने नोंद घ्यावी.
वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. नवले ब्रिज परिसरातील अपघात कमी करण्यासाठी यापूर्वी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी, याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.
गिल म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात अपघात कमी करण्याला प्राधान्य देत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका परिसरात अपघात टाळण्याकरिता मोठ्या आकाराचे जनजागृती फलके लावावीत. जिल्हा पोलीस ग्रामीण दलाकडून अपघातप्रवण स्थळाची यादी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. सर्व संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना सोबत घेवून पोलीस प्रशासनाच्यावतीने यादीतील स्थळनिहाय पाहणी दौऱ्याचे लवकरच आयोजन करण्यात येईल. वाहतूक कोंडीमागे नियमांचे उल्लंघन हे एक प्रमुख कारण असून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, असेही श्री. गिल म्हणाले.
या बैठकीत परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी अपघात कमी करण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


