पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
निगडीतील मिलिंदनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर धारदार वस्तऱ्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून निगडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जून २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिलिंदनगर, सेक्टर क्रमांक २२, निगडी येथे घडली. याप्रकरणी साक्षी प्रकाश पोकळे (वय २१, रा. मिलिंदनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात शेखर माने (वय २२), कमल उर्फ बाब्या बागवान (वय २१) आणि मिठ्ठया (वय २१, पूर्ण नाव निष्पन्न नाही) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी मिलिंदनगर, ओटा स्कीम परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, फिर्यादीचा भाऊ ऋषिकेश हा जेवण करून गल्लीत फिरत असताना आरोपी त्याच्याजवळ आले. “तुला खूप मस्ती आली आहे का? आजीला काय बोलत होतास?” असा जाब विचारत आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. यावेळी आरोपी कमल उर्फ बाब्या बागवान याने जवळील लोखंडी वस्तऱ्याने ऋषिकेशच्या डाव्या गालावर वार केला. या हल्ल्यात तो जखमी झाला.
त्यानंतर आरोपी शेखर माने आणि मिठ्ठया यांनीही ऋषिकेशला शिवीगाळ करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दुखापत करणे, मारहाण आणि सामूहिक हेतूने गुन्हा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार आल्हाट करीत आहेत.


