पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
खेड तालुक्यातील भांबोली येथे मालवाहतूक दरम्यान विश्वासघाताची गंभीर घटना उघडकीस आली असून, टेम्पो चालकाने कंपनीचा लाखो रुपयांचा माल अपहार करून विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्मित अमरचंद गोगरी (वय ३६, रा. ठाणे) यांच्या कंपनीचा टेम्पो (GJ-16 AU-9169) हा गुजरात राज्यातील जगाडिया येथून माल घेऊन पुणे जिल्ह्यातील भांबोली येथील जयवुड पॅलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी येथे जात होता. २१ एप्रिल २०२६ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रवासादरम्यान चालक जितेंद्र सिंग यादव (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) याने वाहनातील मालाचा काही भाग अपहार केल्याचा आरोप आहे.
तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने टेम्पोमधील पाईन लाकडाच्या सुमारे ३ टन वजनाच्या फळ्या (किंमत अंदाजे ४०,००० रुपये) फिर्यादीच्या परवानगीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री केल्या. यामुळे कंपनीचा विश्वासघात झाला असून आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बोराटे करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. औद्योगिक वाहतूक व्यवस्थेत अशा प्रकारच्या अपहाराच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



