spot_img
spot_img
spot_img
spot_img

कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा १२ ऑगस्टपासून पुण्यात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर १२ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेद्वारे भारतीय हॉकीमधील आणखी एका महत्त्वपूर्ण पर्वासाठी पुणे सज्ज झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने ‘हॉकी महाराष्ट्र’द्वारे आयोजित या १२ दिवसांच्या हॉकी स्पर्धेत देशभरातील एकूण ३० संघ सहभागी होणार असून त्यांना तीन विभागांमध्ये (डिव्हिजन) विभागण्यात आले आहे.

२३ ऑगस्ट रोजी ‘डिव्हिजन ए’च्या अंतिम सामन्याने या स्पर्धेची सांगता होईल. या स्पर्धेत ‘प्रमोशन’ (वरच्या विभागात बढती) आणि ‘रेलिगेशन’ (खालच्या विभागात घसरण) या तरतुदींमुळे चुरस अधिक वाढणार आहे.

‘डिव्हिजन ए’ (‘पूल ए’) मध्ये १२ संघांचा समावेश असून त्यांची चार गटांमध्ये (पूल) विभागणी करण्यात आली आहे. ‘पूल ए’ मध्ये हॉकी झारखंड, हॉकी पंजाब आणि हॉकी चंदीगड यांचा समावेश आहे, तर ‘पूल बी’मध्ये हॉकी हरियाणा, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा आणि हॉकी बंगाल हे संघ आहेत. यजमान हॉकी महाराष्ट्र संघाला ‘पूल सी’मध्ये हॉकी उत्तर प्रदेश आणि मणिपूर हॉकीसोबत स्थान देण्यात आले आहे. ‘पूल डी’मध्ये छत्तीसगड हॉकी, हॉकी मध्य प्रदेश आणि हॉकी हिमाचल यांचा समावेश आहे.

प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी (२० ऑगस्ट) पात्र ठरतील आणि त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी उपांत्य सामने खेळले जातील. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना आणि अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी होईल. ‘डिव्हिजन ए’मधील तळाचे दोन संघ ‘डिव्हिजन बी’मध्ये (रेलिगेट केले) समाविष्ट जातील.

‘बी’ डिव्हिजनमध्ये १० संघ असतील; यातील अव्वल दोन संघ ‘विभाग ए’ मध्ये बढती मिळवतील तर तळाचे दोन संघ ‘विभाग सी’ मध्ये खाली जातील. आठ संघांचा समावेश असलेल्या ‘सी’ डिव्हिजनमधूनही अशाच प्रकारे अव्वल दोन संघांना ‘बी’ डिव्हिजनमध्ये बढती मिळेल.

प्रत्येक गटातील सामने लीग पद्धतीने खेळवले जातील, ज्यामध्ये विजयासाठी तीन गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास एक गुण दिला जाईल. ‘ए’ डिव्हिजनमधील ज्या सामन्यांत विजेता निश्चित करणे आवश्यक असेल, तिथे एफआयएचच्या (FIH) स्पर्धा नियमांनुसार ‘शूटआउट’द्वारे निकाल लावला जाईल.

“इतक्या मोठ्या दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणे ही केवळ महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब नाही, तर भारतीय हॉकीच्या भविष्याप्रति असलेली एक जबाबदारीही आहे. या युवा खेळाडूंना सर्वोत्तम व्यासपीठ, सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) आणि ‘हॉकी महाराष्ट्र’चे अध्यक्ष तसेच आयोजन समितीचे प्रमुख कृष्ण प्रकाश (आयपीएस) यांनी सांगितले. “पिंपरी-चिंचवडने हॉकीप्रति आपली कटिबद्धता वारंवार सिद्ध केली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की, हे स्टेडियम देशभरातील सर्वोत्तम युवा प्रतिभेचे स्वागत करत आहे. ही स्पर्धा अधिकाधिक तरुणांना हॉकी खेळण्यासाठी प्रेरित करेल आणि येथे खेळणारे काही खेळाडू भविष्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील, अशी मला खात्री आहे.”

“भारताचे भावी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याच्या प्रक्रियेतील ‘ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे ‘हॉकी महाराष्ट्र’चे सरचिटणीस मनीष आनंद यांनी सांगितले. “तीन विभागांमध्ये ३० संघ सहभागी होत असल्याने, खेळाडूंना केवळ राष्ट्रीय स्तरावरील यशासाठी स्पर्धा करण्याचीच नाही, तर उच्च स्तरावरील मौल्यवान अनुभव मिळवण्याचीही संधी या स्पर्धेतून मिळते. ‘हॉकी महाराष्ट्र’ महिला हॉकीला बळकट करण्यासाठी आणि युवा खेळाडूंसाठी संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला आशा आहे की या स्पर्धेतून अनेक प्रतिभावान खेळाडूंची निवड होईल, जे पुढील स्तरावर प्रगती करू शकतील.”

‘हॉकी इंडिया’चे सह-उपाध्यक्ष आणि ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन’चे उपाध्यक्ष तसेच या स्पर्धेचे आयोजन सचिव मनोज भोरे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हॉकी इंडिया’ची आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करताना ‘हॉकी महाराष्ट्र’ला अभिमान वाटतो. या शहराने भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवले आहेत आणि आम्हाला आशा आहे की, या स्पर्धेतून ऋतुजा पिसाळ, सानिका माने किंवा तनुश्री कडू यांच्यासारखे नवीन खेळाडू समोर येतील. जिथे खेळाडूंची गुणवत्ता बहरू शकेल आणि नवीन तारे उदयास येऊ शकतील, असे वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ही ‘हॉकी महाराष्ट्र’ आणि ‘हॉकी इंडिया’ यांच्या दीर्घकालीन सहकार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. राष्ट्रीय महासंघासोबतच्या १६ वर्षांच्या सहकार्याच्या काळात ‘हॉकी महाराष्ट्र’तर्फे आयोजित केली जाणारी ही १२ वी ‘हॉकी इंडिया’ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा तसेच नेहरू नगर-पिंपरी येथील ‘मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम’वर होणारी ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. या प्रवासाची सुरुवात २०११ मध्ये बालेवाडी येथे झालेल्या ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेने झाली होती.

अलीकडच्या काळात भारतीय हॉकीमध्ये महाराष्ट्राचे योगदान लक्षणीयरीत्या वाढले आहे. ऋतुजा दादासो पिसाळ हिची भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक मोहिमेसाठी निवड झाली आहे तर सानिका माने आणि तनुश्री कडू या ज्युनियर खेळाडूंची चीनमधील ज्युनियर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पुरुष गटात, सूरज करकेरा याची आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषकासाठी, आदित्य लालागे याची विश्वचषकासाठी तसेच अर्जुन हरगुडे याची ज्युनियर आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!