शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील अजंठानगर, कृष्णानगर, भीमशक्ती नगर, महात्मा फुले नगर, घरकुल, कोयना नगर, शरद नगर, पूर्णा नगर, हरगुडे वस्ती, नेवाळे वस्ती आदी भागांमध्ये असलेल्या स्ट्रॉम वॉटर लाईन, नाले आणि ड्रेनेज लाईनची पावसाळ्यापूर्वी तातडीने सखोल सफाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती जाधव यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ, कचरा तसेच झाडाझुडपे मोठ्या प्रमाणात साचलेली असून त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. वेळेत साफसफाई न झाल्यास पावसाचे पाणी रस्ते आणि वसाहतींमध्ये शिरून नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. तसेच ड्रेनेज लाईन तुंबल्यास सांडपाणी रस्त्यावर येऊन सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः घरकुल परिसरातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांपासून पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेकदा साचलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. पावसाळ्यात घरकुल परिसरात नदीचे रौद्ररूप धारण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने युद्धपातळीवर नालेसफाई मोहीम हाती घेऊन सर्व स्ट्रॉम वॉटर लाईन, नाले आणि ड्रेनेज लाईनची तातडीने पाहणी व साफसफाई करावी, अशी मागणी मारुती जाधव यांनी केली आहे. पावसाळ्यात नागरिकांना जलसाचणे, पूरस्थिती आणि अस्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


