शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील वरळीत झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्थानिक नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, असा ठाम आग्रह धरला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “स्वबळासह काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल,” असे सूचित केले.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपसभापती अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने वर्षानुवर्षे मजबूत काम केले आहे. २०१७ चा अपवाद वगळता आपले वर्चस्व कायम राहिले आहे. आता ही निवडणूक स्वबळावर लढणे गरजेचे आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुन्हा बैठक घेऊ आणि मतदार याद्या तपासून तयारी करा.” तसेच, त्यांनी नवीन कार्यकारिणी लवकर जाहीर करण्याच्याही सूचना दिल्या. पवार म्हणाले की, “काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार मैत्रीपूर्ण लढत आवश्यक असेल, पण पक्षाची मुख्य लढत स्वबळावरच होईल.”


