
ते एमआयटी आर्ट, डिझाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणेच्या ११व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे माजी महासंचालक पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. शिंदे पुढे म्हणाले, केवळ ज्ञान पुरेसे नाही. ज्ञानासोबत दैनंदिन जीवनात वापरण्याचे कौशल्य, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी असणे आवश्यक आहे. कारण तंत्रज्ञान प्रगत असू शकते; मात्र माणुसकीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे भारताचे शिक्षण अधिक कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि जागतिक दर्जाशी सुसंगत बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा काळात एमआयटी एडीटी विद्यापीठासारख्या संस्था देशातील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपली विद्यापीठे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप्स आणि उद्योजकतेची भावना निर्माण करत आहेत. त्यामुळे येथून बाहेर पडणारे विद्यार्थी हे नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे ठरतील, याची मला खात्री आहे.
प्रा. डॉ. मंगेश कराड यावेळी म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाल्याने सध्या जग एका क्लिकवर आले आहे. वेगाने धावणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही एआयसारख्या तंत्रज्ञानासोबत सुसंगत व्हावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवावी लागेल. आता विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे केवळ शिक्षण देऊन भागणार नाही, तर त्यांच्यात उद्योजकता, नवसंशोधनाची वृत्ती आणि जागतिक पातळीवर नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करावी लागणार आहेत. जागतिक पातळीवरील नामांकित विद्यापीठे भारतात येत असताना आपल्यासारख्या विद्यापीठांना जागतिक स्तरावरील शिक्षण पुरवावे लागणार आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
विश्वशांती प्रार्थनेने सुरुवात, तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश एस. यांनी, तर आभार डॉ. पुजेरी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.
भारत जगाचा जेनेरिक औषध पुरवठादार
आपल्या देशाने गेल्या ७५ वर्षांत मोठी प्रगती केली आहे. हरित क्रांती, श्वेत क्रांती, अंतराळ संशोधन, अणुसंशोधन, संरक्षण आदी आघाड्यांवर भारताने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. यासोबतच आरोग्य क्षेत्राचा वाटाही उल्लेखनीय आहे. भारत सध्या जगाला जेनेरिक औषधांचा पुरवठा करण्यात आघाडीवर आहे. जवळपास ६० टक्के औषधे आणि लसी भारतीय बनावटीच्या आहेत. भारताचे अनेक डॉक्टर आणि परिचारिका जगाच्या विविध कोपऱ्यांत अभिमानाने सेवा देत आहेत. आपण तयार केलेल्या लसींमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे आता भारताला विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.
— पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव,
माजी महासंचालक, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)
कोट
विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यावर भर
विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानासोबतच मूल्याधिष्ठित शिक्षण पुरवावे, यासाठी एमआयटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. सध्या एमआयटीतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात संतश्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा विश्वशांतीचा, विज्ञानाचा संदेश पोहोचविताना दिसतो. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी एकत्र चालणाऱ्या आहेत. अगदी अशाच प्रकारचे शिक्षण एमआयटी एडीटी संकुलात दिले जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे.
— प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड,
संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी शिक्षण समूह, भारत




