शबनम न्यूज | प्रतिनिधी
९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक व लोकशाहीवादी संघटनांच्या वतीनेही आहे‘जवाब दो – लोकशाही-संवैधानिक हक्कांसाठी मोहीमे’ अंतर्गत आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘आरएसएस चले जाव, भाजप चले जाव’, ‘शहा, मोदी, फडणवीस राजीनामा द्या’, ‘भाजप हटवा, देश वाचवा’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.
बेरोजगारी, महागाई, शिक्षण व आरोग्याचे खासगीकरण, कामगार व शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील हिंसा, अल्पसंख्याकांवरील हल्ले तसेच संविधान व लोकशाहीच्या होत असलेल्या संकोचाचा आंदोलकांनी निषेध केला. सर्वसामान्यांना मोफत, समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा, कामगारांना कायद्याचे संरक्षण आणि सामाजिक न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात मेधा थत्ते, विनया मालती हरी, सीमा काकडे, मिलिंद चव्हाण, दत्तात्रय जाधव, सचिन देसाई, दत्ता पाकिरे, साधना शिंदे, अंजुम इनामदार, सयाजी शिंदे, दीपक पाटील यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.



