शबनम न्यूज | प्रतिनिधी
गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा कडेलोट झाला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या, शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा इतकी साधी विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र सत्तेच्या मग्रुरीत असलेल्या मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. शेतकऱ्यांचं आंदोलन जसं पोलिस बळाचा वापर करून चिरडून टाकलं तसंच विद्यार्थ्यांचं आंदोलनही चिरडून टाकू अशी हवा मोदी सरकारच्या डोक्यात होती. मात्र, विद्यार्थ्यांनी देशव्यापी संघर्ष उभा केला, काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी “छात्रों की गुंज” या देशव्यापी मोहिमेतून जी क्रांतीची मशाल पेटवली आणि या क्रांतीच्या शक्तिपुढे मग्रूर मोदी सरकारला झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि जवळपास २८ दिवसांच्या संघर्षाला यश आले.
मात्र, या २८ दिवसांत एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली. “धर्मेंद्र प्रधान” हा प्रश्न खूप छोटा असून, मोदी सरकारचा अहंकार हा मुख्य प्रश्न म्हणून पुढे आले. मोदी सरकारने विद्यार्थ्यांवर पोलिसांचे बळ वापरले, मोर्चात भाजपाचे गुंड घुसवले, विद्यार्थ्यांवर टिअर गॅसचा, पॅलेट गनचा वापर केला, भाजपच्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधले, त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची उघड धमकी दिली… हे चित्र पाहून मोदी सरकारचा अहंकार हा सर्वांत मोठा प्रश्न आहे ही बाब समोर आली. सरकारचा हा अहंकार मोडून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या मोर्चाची हाक काँग्रेस पक्षाने दिली असली, तरीही मोर्चात कोणत्याच पक्षाचा राजकीय झेंडा दिसला नाही, कोणतीही राजकीय घोषणाबाजी झाली नाही, केवळ देशातील तरुणाईच्या न्यायासाठी तिरंगा राष्ट्रध्वज हातात घेऊन हजारो पुणेकर या मोर्चात सहभागी झाले.
मोदी सरकारने विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष हल्ल्याबाबत जाहीर माफी मागावी, आंदोलक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी त्यांच्यावर नोंदवलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, आत्महत्या केलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या कॅन्डल मार्चला तमाम पुणेकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.
या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, ज्येष्ठ नेते गोपालदादा तिवारी, रफिक शेख, साहिल केदारी, सुनील शिंदे, शिवा मंत्री, विशाल मलके, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, दिपालीताई डोख, सौरव अमराळे, अभिजीत गोरे, पुष्कर आबनावे, अक्षय जैन, स्वातीताई शिंदे यांच्यासह पुणे शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.


