spot_img
spot_img
spot_img

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मारुती भापकर यांची प्रतिक्रिया; ‘हा लोकशाही आणि युवाशक्तीचा विजय’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत हा “लोकशाही आणि युवाशक्तीचा ऐतिहासिक विजय” असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली, असा दावा त्यांनी केला आहे.

भापकर यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलनकर्त्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्यानंतर अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या युवा कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी “कॉकरोच जनता पार्टी” स्थापनेची घोषणा केली. त्यांच्या आवाहनाला देश-विदेशातील मोठ्या संख्येने युवक व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर नीट व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात व्यापक आंदोलन उभे राहिले, असे त्यांनी नमूद केले.

प्रसिद्धीपत्रकानुसार, अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात येऊन ६ जून २०२६ पासून जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.

भापकर यांच्या म्हणण्यानुसार, पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण सुरू केले होते. तसेच २० जुलै रोजी संसदेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर व अन्य बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर देशभरातील युवक मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला.

या आंदोलनाला विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढत गेला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, असेही भापकर यांनी म्हटले आहे.

मात्र, केवळ राजीनामा हा संघर्षाचा शेवट नसल्याचे सांगत भापकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्याचे नमूद केले आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस अत्याचारांची चौकशी आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

युवकांनी भविष्यातही शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार, जल-जंगल-जमीन संरक्षण आणि लोकशाही मूल्यांसाठी संघटितपणे काम करावे, असे आवाहन करत भापकर यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, युवक, कार्यकर्ते आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे अभिनंदन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!