spot_img
spot_img
spot_img

नागपूर राष्ट्रीय महत्वाचा बाजार; अध्यक्षपदाचा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला “राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार” (Market of National Importance) म्हणून घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनात या बाजाराच्या अध्यक्षपदाचा पदभार राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मुख्यालयातून स्वीकारला.

यावेळी आ. चरणसिंग ठाकूर,पणन संचालक शरद जरे तसेच नागपूर राष्ट्रीय महत्त्वाचा बाजाराचे सचिव दिनेश चंदेल उपस्थित होते.

यावेळी पणन मंत्री रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्याची विपणन व्यवस्था अत्याधुनिक आणि सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून उत्कृष्ट रस्ते, रेल्वे, हवाई आणि लॉजिस्टिक सुविधांमुळे कृषी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून नागपूर कृषी उत्पन्न बाजाराचे सर्व कामकाज महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम तसेच शासनाच्या अधिसूचना व निर्देशांनुसार पारदर्शक, कार्यक्षम आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने राबविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी, वाहतूकदार, कर्मचारी आणि संबंधित संस्था यांना विश्वासात घेऊन नागपूर राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे कामकाज यशस्वीपणे चालवण्यात येईल.नागपूर राष्ट्रीय महत्वाचा बाजाराला देशातील आदर्श, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित कृषी व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले.

शासनाने २ जून २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाचा बाजाराचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच संपूर्ण कृषी व्यापार क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला स्पर्धात्मक दर मिळावेत, कृषी मालाच्या विपणनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया उद्योग, निर्यात क्षमता आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजारासह कळमना व इतर उपबाजारांचा समावेश आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक यांसह अकरा राज्यांतून येथे शेतमालाची आवक होते. कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्ये आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री येथे केली जाते. सन २०२४-२५ मध्ये या बाजार समितीने ६२ कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त केला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!