मुख्यमंत्री यांच्याकडे विनोद वरखडे पाटील यांची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाला “लोकनेते अजित दादा पवार मिसिंग लिंक महामार्ग” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात वरखडे पाटील यांनी म्हटले आहे की, मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख महानगरांना जोडणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेला मिसिंग लिंक प्रकल्प हा देशातील अत्यंत आव्हानात्मक आणि आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे.
या प्रकल्पासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पातून सातत्याने निधी उपलब्ध करून दिला. तसेच प्रशासकीय मंजुरी, भूसंपादन आणि विविध तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतल्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली आणि तो अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून वेळ व इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
अजितदादा पवार यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला “लोकनेते अजित दादा पवार मिसिंग लिंक महामार्ग” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी पुणे व रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली असून मुख्यमंत्री यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विनोद वरखडे पाटील यांनी व्यक्त केली आहे.



