शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेला पुढे नेणाऱ्या आणि देशभक्तीच्या जयघोषात न्हाऊन निघणाऱ्या ‘हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा’ अभियानाची पिंपरी-चिंचवड शहरात अत्यंत उत्साहात आणि भव्यदिव्य तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नवीनजी यांच्या निर्देशानुसार आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ स्तरावर हे कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची (भाजप) विशेष जिल्हा बैठक पार पडली.
या बैठकीचे ‘हर घर तिरंगा’ चे जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे यांनी आयोजन केले होते.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांसह विधान परिषद आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सरचिटणीस विकास डोळस यांनी देखील मार्गदर्शन केले
याप्रसंगी मधुकर बच्चे, वैशाली खाड्ये, महिला मार्चच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव, सहसंयोजक अजित कुलथे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, मोहन राऊत, मंगेश धाडगे, सनी बारणे, जयदीप खापरे, सोमनाथ तापकीर, हर्षल ढोरे, धरम वाघमारे, अजय साने, प्रवक्ते कुणाल लांडगे यांच्या सह सर्व लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक- नगरसेविका, मंडळ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या बैठकीला मोरेश्वर शेडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानाच्या यशस्वी नियोजनावर चर्चा केली.
या अभियानांतर्गत १० ते १३ ऑगस्ट २०२६ या काळात युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या पुढाकाराने विधानसभा स्तरावर देशभक्तीपर गीते व सजावटीसह भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. यात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, विशिष्ट नागरिक, सेवानिवृत्त सैनिक, सुरक्षा कर्मचारी, सामाजिक संस्था, तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित केला जाणार आहे. तसेच शहीद स्मारके, वीर सपूत व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन केले जाईल आणि देशसेवेसाठी शहीद झालेले पोलीस कर्मचारी व सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल.
तसेच १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान बूथवरील प्रत्येक घरावर बालक, युवक व युवतींच्या हातून कापडी तिरंगा ध्वज फडकवला जाईल, जेणेकरून त्यांच्यामध्ये देशाची एकता, अखंडता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल. ध्वज फडकवतानाचे फोटो ‘नमो ॲप’, ‘सरल पोर्टल’, अधिकृत संकेतस्थळ तसेच सोशल मीडियावर रील्स आणि फोटो याद्वारे प्रसारित केले जातील आणि १५ ऑगस्टच्या सायंकाळी ५ वाजता तिरंगा सन्मानाने खाली उतरवला जाईल. याशिवाय १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त कोणतीही घोषणा न देता फक्त योग्य ते फलक व बॅनर हाती घेऊन मौन मिरवणूक काढली जाईल, फाळणीचे दुष्परिणाम भोगावे लागलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल आणि समारोप स्थानी छायाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्यान व चर्चा सत्र आयोजित केले जाईल.
तिरंगा हा केवळ आपला राष्ट्रध्वज नसून भारताच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि राष्ट्रीय अभिमानाचे गौरवशाली प्रतीक आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या या देशव्यापी चळवळीमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामनात देशभक्तीची भावना जागृत झाली आहे. यंदा दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे अभियान उत्साहात साजरे केले जाणार आहे.



