शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पुणावळे परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (देहूरोड–कात्रज बायपास) लगतच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी सर्व्हिस रोड जलमय झाले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाणी साचल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसही अनेक ठिकाणी पाण्यात अडकल्या असून विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
या समस्येबाबत पुनावळेकर अभियानाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव नवनाथ मारुती ढवळे यांनी यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी तक्रारी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात अशाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत नवनाथ ढवळे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवाहन केले आहे की, सर्व्हिस रोडवरील पाणी त्वरित बाहेर जाण्यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्यात यावी, खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी आणि नागरिकांना या समस्येतून दिलासा द्यावा.
पुणावळे परिसरातील वाढती वाहतूक, पाणी साचण्याची समस्या आणि त्यातून निर्माण होणारे ट्रॅफिक जॅम याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.


