spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन; ‘भारतरत्न’ देण्यासाठी पाठपुरावा करणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सारसबाग येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रखर हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे आणि सीए सर्वेश मेहेंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव नयन ठाकूर, विश्वस्त ॲड. श्रीराम जोशी, अमरनाथ देवळालीकर, आर्य नयन ठाकूर, विश्व हिंदू जागृती फाउंडेशनच्या विश्वस्त मुक्तीका वाटखेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, हिंदुत्व विचारधारा आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तरुण पिढीने सावरकरांचे विचार आत्मसात करून राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हिंदू जनजागृती, संघटन आणि हिंदू समाजाने लोकसंख्या वाढीबाबत सजग राहण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करत मिलिंद एकबोटे म्हणाले की, हिंदूंनी सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक स्तरावर एकत्र येत भविष्यातील पिढ्यांसाठी जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यांच्या मार्गदर्शनास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने महत्त्वपूर्ण भूमिका मांडण्यात आली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, यासाठी मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

पुढील वर्षी ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या नावाने तात्यारावांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित सावरकरप्रेमींनी या भूमिकेला उत्स्फूर्त समर्थन दर्शविले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!