शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील कात्रज-नवले पूल परिसरात आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. नवले पुलावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. वाहन रस्त्यावरून जात असताना अचानक त्यातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच गाडीने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच वाहनातील प्रवाशांनी तत्काळ प्रसंगावधान राखत गाडीबाहेर सुरक्षितपणे बाहेर पडण्यास यश मिळवले.
घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली असून, आग विझवण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जळणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली.
या घटनेमुळे नवले पूल परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, काही काळासाठी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. आधीच वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात आजच्या घटनेने परिस्थिती अधिक गंभीर बनली.
सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नवले पूल परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


