शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक असून त्यातूनच मानवी संस्कृती जिवंत राहते!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी व्यक्त केले. जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित पुस्तकपूजन आणि कवयित्री हेमांगी बोंडे लिखित ‘मधुगंधित हेमाक्षरे : कवितांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘सरवा’कार प्रा. किसन वराडे तसेच प्रा. संजय पवार यांच्या विशेष उपस्थितीत, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले; या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीत स्वलिखित आणि आवडलेल्या पुस्तकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. किसन वराडे, प्रा. संजय पवार, शाखा उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, कवयित्री हेमांगी बोंडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभय कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड शहरातील ज्येष्ठ पुस्तक विक्रेते राजू कासट व सुनील टेपाळे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘आज जगाचा नकाशा युद्धाने काळवंडला आहे. या पार्श्वभूमीवर स्थल कालाच्या सीमा ओलांडून पुस्तकातून मिळणारे ज्ञान जगातील माणुसकी आणि मानवी संस्कृती वाचवू शकते. ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या शीर्षकावरून कवयित्री हेमांगी बोंडे यांचा आत्मविश्वास प्रतीत होतो; तसेच अनुभव आणि आयुष्याची पुण्याई सर्व प्रकारच्या कवितांसाठी पणाला लावून त्यांनी पूर्वसुरींशी आपल्या काव्याचे नाते जोडले आहे!’ राजन लाखे यांनी, ‘प्रज्ञा, प्रतिभा, प्रगल्भता अन् भाष्य यांचा समन्वय म्हणजे लेखनप्रक्रिया होय आणि या प्रक्रियेचा प्रत्यय ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या काव्यसंग्रहातून येतो. मुक्तच्छंद आणि शिस्तच्छंद म्हणजेच वृत्तबद्धता पाळून लिहिलेल्या या सर्व कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात ही कवयित्रीची भावना अत्यंत स्तुत्य आहे!’ असे गौरवोद्गार काढले. प्रा. किसन वराडे यांनी, ‘कवयित्री हेमांगी बोंडे यांची प्रतिभा सर्वस्पर्शी असून त्यांच्या समाजाभिमुख कविता तरल संवेदनशीलता प्रदर्शित करतात!’ असे भाष्य केले; तर प्रा. संजय पवार यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांचा प्रचार अन् प्रसार करण्याची सुसंधी लाभली आहे, असे मत व्यक्त केले. कवयित्री हेमांगी बोंडे यांनी आपल्या मनोगतातून, ‘अध्यापनाच्या सेवेत असताना शैक्षणिक लेख, सामाजिक नाटक यासारखे तुरळक लेखन हे सेवानिवृत्तीनंतर करोना काळात ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’ या समूहातून शिकलेले कवितांचे विविध प्रकार या काव्यसंग्रहात आहेत. प्रार्थना, आरतीपासून भारुड, लावणी यासारखे पारंपरिक प्रकार, विडंबन, व्याकरणातील अलंकार वापरून कविता, विविध गीतप्रकार, रसप्रधान रचना, मुक्तच्छंद, ओवी, अभंग, चाराक्षरी ते चौदाक्षरी अशा अक्षरछंद रचना, वृत्तबद्ध कविता, गझल, हझल, हायकू, दोहा, मायबोली लेवा गणबोलीतील कविता अशा अनेक प्रकारांच्या कवितांची मांदियाळी ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या माझ्या पहिल्याच संग्रहात समाविष्ट केली आहे. जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्याचे प्रकाशन होत आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो. तो प्रत्येक माध्यमिक ग्रंथालयाच्या संग्रही असावा!’ अशी भावना व्यक्त केली.
विनिता श्रीखंडे, नीलिमा फाटक, कमल सोनजे, जयश्री श्रीखंडे, इला पवार, गीता सुतार, अनघा पाठक यांनी संयोजनात सहकार्य केले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बोंडे यांनी आभार मानले.




