पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
मोशीतील शिवाजीवाडी चौकात भरदिवसा तिघा रिकव्हरी एजंटांनी एका शेतकऱ्याची कार अडवून काच फोडत चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिवाजीवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्ग, मोशी येथे घडली. याप्रकरणी संदीप सोपान कड (वय ३८, रा. संतोष नगर, वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रकाश तानाजी जाधव (वय २५), दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय ३०) आणि सुरज तुकाराम कुसाळकर (वय २५) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही रिकव्हरी एजंट म्हणून काम करतात.
फिर्यादी हे त्यांच्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना आरोपींनी दुचाकी आडवी लावून त्यांची कार थांबवली. वाहनाचे हप्ते न भरल्याचा तसेच गाडी न थांबवल्याचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर कारची काच फोडून फिर्यादीवर हल्ला चढवला.
आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या दंडावर चाकूने वार करून जखमी केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.




