spot_img
spot_img
spot_img

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती ; खा. श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश  

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ट्रॅकचे काम लवकरच सुरु होईल. ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. वेळेत कार्यालय, महाविद्यालयात जाता येईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

 केंद्र सरकारने 2014-15 मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च 2100 कोटी होता. 2022 मध्ये खर्च 2200 कोटी रुपयांवर गेला. आता साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा खर्च गेला आहे. त्यात जागा भूसंपादनासह सर्व कामाचा समावेश आहे. याचा 50 टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि 50 टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या 50 टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने तत्कालीन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. परंतु, सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. 50 टक्क्यांच्या हिस्सा दिला नाही. त्यामुळे प्रकल्प रखडला होता.

शिवसेनेचे मुख्य नेते, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर खासदार बारणे यांनी शिंदे यांच्यासह तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत बैठका घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी दोनवेळा बैठक घेऊन माहिती घेतली. हा प्रकल्प महारेल की केंद्र सरकार करणार यामध्ये रखडला. त्यानंतर पुन्हा खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी  बैठक घेतली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेतली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे तिसरा, चौथा ट्रॅक मार्गी लागणार आहे. तिस-या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडहून मुंबईला जाणा-या प्रवाशांसाठी अधिकच्या गाड्यांची सुविधा उपलब्ध होईल. नोकरदारांना कामावर वेळेवर पोहोचता येईल. नोकरदारांची लेटमार्कपासून सुटका होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

 मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उमुख्यमंत्र्यांचे आभार

तिस-या आणि चौथ्या ट्रॅकची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रत्येक रेल्वेमंत्र्यांकडे बैठक घेतली. त्यानंतर राज्य सरकारने 50 टक्के हिस्सा उचलावा यासाठीही प्रयत्न केले. पण, मागील सरकारने याकडे सकारत्मकपणे पाहिले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उमुख्यमंत्र्यांचे मी मावळवासीयांच्या वतीने आभार मानतो. आता लवकरच  काम सुरु होईल, असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

  पुणे आणि लोणावळा दरम्यान वाढत्या प्रवास लक्षात घेऊन रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यासाठी अर्थसंकल्पात सुमारे 5100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा लोणावळा, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे परिसरातील प्रवाशांना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे.

श्रीरंग बारणे
खासदार

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!