शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदेतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट कोणी टाकले. लाच प्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाला अटक झाली. कोयता गॅंगने शहरात हैदोस घातला. अशा अनेक गोष्टी पिंपरी-चिंचवडमध्ये घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर काहीही बोलणार नाही. पण, यात सुधारणा करण्यासाठी शहरातील कारभारी बदला असे आवाहन शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची किवळेतील मुकाई चौकात सभा आयोजित केली होती. त्यांनी मोबाईल व्हिडिओ कॉलींगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्नजीत बारणे, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, जिल्हा संघटिका शिला भोंडवे, रुपेश कदम, सायली साळवे, माऊली जगताप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीला गतीमान करणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. शिवसेना विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. शहरात बदल, परिवर्तन घडविण्याची, कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. इतिहास टक्कर देणाऱ्यांचाच लिहिला जातो, तडजोड करणाऱ्यांचा नाही. त्यामुळे कोणालाही घाबरू नका आणि बिनधास्त लढावे. गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर सातत्याने टीका होत आहे. शिव्याशाप दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हीही संयम ठेवा. हाल होतील, पण हार होणार नाही. सत्याला त्रास होतो, पण सत्य कधीही पराभूत होत नाही. शिवसेना स्वबळावर लढत असून तिला कोणीही हलक्यात घेऊ नये. शहराच्या विकासाठी मोठा निधा दिला आहे. सांडपाणी निचऱ्यासाठी ५२ कोटींचा निधी दिला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५३ कोटींची योजना मंजूर केली. पवना जलवाहिनी प्रकल्प राबविला जाणार आहे. नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केला जाईल. पवना-मुळा-इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणार आहे. समाविष्ट भागातील अर्धवट डीपी रस्ते पूर्ण केले जातील. चुकीचा डीपी दुरुस्त केला जाईल. वाकड-हिंजवडी वाहतूक कोंडी सोडविणार आहे. चापेकर स्मारकासाठी ६८ कोटींचा आराखडा मंजूर केला असून १३ कोटी वर्ग केले आहेत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आहे. तोही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत
सत्तेत आल्यानंतर शास्ती कर आणि त्यावरील दंड माफ केला. बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा दिला. ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांच्या विचारांशी तडजोड होणार नाही. एकदा शिवसेनेच्या हाती सत्ता देऊन दाखवा, विकासाचे कुलूप उघडून दाखवतो. मला काय मिळाले? यापेक्षा लोकांना काय दिले?, हे महत्त्वाचे आहे. आम्ही शब्द देऊन थांबत नाही, तर तो पाळतोही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म नक्कीच झाला आहे. शहरात भगवे वादळ आले असून शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत दिसले, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
भय, भ्रष्टाचार, प्रदूषण मुक्त शहर करणार
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भय, भ्रष्टाचार, प्रदूषण मुक्त शहर करण्यावर भर राहील. एक पक्ष दुसऱ्यावर आणि दुसरा पक्ष त्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या दोघांमध्ये भ्रष्टाचाराबाबत स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत शिवसेनेला उतरायचे नाही. शहरातील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावेत. गुंठेवारी कायद्यानुसार नियमित झालेल्या घरांच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन हक्काचे घर त्यांच्या नावावर केले जाणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित व्हावेत यासाठी मी लढा दिला आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रलंबित प्रश्व मार्गी लावले जातील.


