शबनम न्यूज | प्रतिनिधी
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठू गाव परिसरातील जंगलात तरुणीची निर्घृण हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी विष्णू महादेव पावडे (वय ३२, रा. धानोरे ता. खेड जि. पुणे, मूळ रा. हातगाव ता. पैलु जि. परभणी) यास अटक करण्यात आली असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८/२०२६ नुसार बी.एन.एस. कायदा २०२३ चे कलम १०३ (२), २३८ (क) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपी व मृत महिला (वय ३०) हे दोघे कामानिमित्त एकत्र घरातून बाहेर पडले होते.
त्यानंतर मोटारसायकलवरून साठू गावाजवळील डोंगरावरील जंगलात गेले असता, अज्ञात कारणावरून आरोपीने मृत महिलेस कपटाने गळा आवळून जिवे ठार मारले.
हत्या केल्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने व आत्महत्येचा बनाव निर्माण करण्यासाठी आरोपीने मृतदेह जंगलातील एका झाडाला जमिनीपासून सुमारे चार फूट उंचीवर स्कार्फच्या साहाय्याने बसलेल्या स्थितीत बांधून ठेवला व तिने आत्महत्या केली असल्याचा आभास निर्माण केला.
त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणाचा तपास आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुमार कोडीबा गिरीगोसमावी (वय ३९) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


