शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांनी जगद्गुरु संत तुकाराम संतपीठासोबत विशेष बैठक घेतली. हिंद-दी-चादर या कार्यक्रमात शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी महापौर रवि लांडगे यांनी केले.
महापालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खोत, शिक्षणाधिकारी तथा संतपीठाच्या सचिव संगीता बांगर, महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजू महाराज ढोरे, संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, चिंतन समिती सदस्य ज्ञानेश्वर भांगरे, शिक्षक महेश शेळके, अविनाश भोगील, चंद्रकांत गोसावी, विलास कोकाटे, शिक्षिका मंगल अंबरे, अर्चना देसाई, सुचेता पुजारी, मुग्धा शिरोडकर, पूर्णिमा इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मासाठी नसून संपूर्ण मानवतेच्या स्वातंत्र्य आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी होते. ‘हिंद-दी-चादर’ हा कार्यक्रम त्यांच्या त्यागाची आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांची आठवण करून देणारा आहे. पिंपरी चिंचवड शहर हे विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक दृढ होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे,’ असे आवाहन देखील त्यांनी केले.
या बैठकीत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत या कार्यक्रमाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला. कीर्तन, प्रवचन, जनसंवाद आणि सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून युवक, महिला मंडळे, सामाजिक संस्था आणि संघटनांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. संत परंपरेतून दिलेला समतेचा आणि बंधुभावाचा संदेश ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.


