शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील मोहन नगर, काळभोर नगर, आकुर्डी परिसरात गेल्या सात-आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या जाणवत आहेत. पिण्याच्या पाणी हे गढूळ पाणी येत असल्याने या परिसरातील अनेक नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. तरी या परिसरातील येणाऱ्या गढूळ पाण्यावर त्वरित उपाययोजना करून सदर समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मिनल विशाल यादव यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. याची त्वरित दखल घेत मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दूरध्वनी द्वारे संभाषण करून या पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा त्वरित तोडगा काढून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिनल यादव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असून, निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सात आठ दिवसांपासून मोहन नगर, काळभोर नगर, आकुर्डी परिसरात दूषित पिण्याचे पाणी येत असल्याने नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये घसा दुखणे ,पोट दुखणे असे विविध आजार उद्भवले गेले आहे. तरी या परिसरातील पिण्याच्या पाण्यावर तोडगा काढून लवकरात लवकर स्वच्छ पाणी मिळविण्याकरिता कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला यश आले असून, त्वरित या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहे.


