शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुढील पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असल्याची महत्त्वाची माहिती मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
आमदार शेळके यांनी सांगितले की, सध्या पार पडणारी शपथविधीची प्रक्रिया राष्ट्रवादी पक्षातील काही ज्येष्ठ नेते तसेच कायदेशीर तज्ञांच्या सल्ल्यानुसार लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक होते. त्यानुसार आज सुनेत्रा वहिनी यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडत असून, त्यानंतर येत्या काही दिवसांतच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे औपचारिक विलीनीकरण होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रक्रियेस अनुकूल भूमिका घेतल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा वहिनी यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज पार पडणार असून, मंत्रिमंडळातील अन्य खाते कोणाकडे देण्यात येणार, याबाबतचा निर्णय पुढील पंधरा दिवसांत निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले.
या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये नव्या समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


